मावळ ऑनलाईन – पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक यात्रा नसून ती भक्ती, शिस्त आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतिक आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि लाखो वारकरींच्या पायी चालणाऱ्या या वारीचा अनुभव घेताना संपूर्ण महाराष्ट्र एका भक्तिमय लाटेत सामील होतो. मात्र काही जण विविध कारणांमुळे प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकत नाहीत. अशा रसिकांसाठी वडगाव साहित्य कला संस्कृती मंडळाने यंदा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे – ‘लेखनवारी’!
वारीच्या पंधरवड्यात प्रत्यक्ष वारी शक्य नसलेल्या साहित्यप्रेमींनी लेखनाच्या माध्यमातून हा अनुभव घ्यावा, संत परंपरेचा अभ्यास व चिंतन करावं, हा या उपक्रमामागचा हेतू आहे. “एकदा तरी वारी करायची” हा प्रत्येक मराठी मनाचा संकल्प, ‘लेखनवारी’च्या रूपाने लेखणीच्या वाटेवरून पूर्ण करता येईल, अशी कल्पक संकल्पना मंडळाने साकारली आहे.
या उपक्रमात सहभागी लेखकांना खालील विषयांवर लेखन करता येणार आहे:
- महाराष्ट्रातील संत परंपरा
- संतांच्या जीवनातील प्रेरक घटना व चमत्कार
- संतांचे तत्त्वज्ञान व विचार
- संतांचे ग्रंथ, रचना व वाङ्मय
- संतविचारांची आजच्या काळातील उपयुक्तता
- पंढरपूर, पंढरीनाथ आणि वारकरी परंपरा
- पालखीचे नियोजन व निर्मलवारीची संकल्पना
- संतवाणीवर चिंतन
लेखनवारीचे हे रोजचे लेखन १५ दिवसांचे असून, आषाढी एकादशीच्या दिवशी या उपक्रमाची सांगता होणार आहे. विशेष म्हणजे, निवडक लेखांचे संकलन करून एक विशेषांक प्रकाशित करण्याचाही मानस मंडळाने व्यक्त केला आहे.
Kundmala Bridge Update : कोसळलेल्या साकव पुलावर अडकलेल्या सात दुचाकी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोरखंडांनी बाहेर काढल्या
या उपक्रमामागचा मुख्य हेतू म्हणजे वाचन, चिंतन आणि लेखन यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच नव्या पिढीला संतांचे विचार समजून घेण्यास प्रवृत्त करणे. सोशल मीडियाच्या भुलाव्यातून बाहेर येऊन लेखन व विचारांची परंपरा वृद्धिंगत व्हावी, हा या उपक्रमाचा आत्मा आहे.
लेखन पाठविण्याची पद्धत:
आपले लेख साहित्य मंडळाच्या WhatsApp ग्रुपवर किंवा ई-मेलद्वारे sahityamandalvadgaon@gmail.com या पत्त्यावर पाठवावेत. निवड लेख, कविता आणि चिंतनलेख विशेषांकात समाविष्ट करण्यात येणार आहेत.
संपर्क:
वडगाव साहित्य कला संस्कृती मंडळ
(मावळ तालुका)