मावळ ऑनलाईन – भाषेचे मूळ शोधणे अवघड नसते. मौखिक परंपरेने जपत आलेले लोकसाहित्य हेच मूळ साहित्य असून आपल्या लोकसाहित्याच्या आदिम व्यवस्थेमध्ये मराठी भाषेची मूळ शोधता येते असे मत मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी व्यक्त केले. साहित्य अकादमी आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लोकरंगभूमी आणि अभिजात मराठी या विषयावरील एक दिवसीय परिसंवादात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
या प्रसंगी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे, ज्येष्ठ कादंबरीकार व साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे,साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर,डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, डॉ. मुकुंद कुळे, संतोष शेणई, सोपान खुडे, प्रभाकर ओव्हाळ, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,सदस्या निरुपा कानिटकर, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे तसेच महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे बोलताना डॉ. आवलगावकर म्हणाले की, लोक ही संकल्पना व्यापक जीवनाचे प्रतीक आहे. आपले आदिम जमातींचे नृत्य हे लोकरंगभूमीचे पहिले पाऊल म्हणता येईल. शास्त्रीयतेत घराणे हा शब्द तयार होण्याच्या कितीतरी आधी लोकरंगभूमीने आपली एक स्वतंत्र परंपरा निर्माण केली होती असे बोलून त्यांनी मराठीच्या आदिम परंपरेचा गौरव केला.
याप्रसंगी बीजभाषक म्हणून आपले मत मांडताना डॉ.प्रकाश खांडगे यांनी अभिजात भाषांनी बोलीभाषांना गावकुसाबाहेर ठेवले असल्याची खंत व्यक्त केली. अभिजात भाषेला ऊर्जा देण्याचे काम बोलीभाषा करत असतात. लोकरंगभूमीवरील अभिजात मराठी भाषा ही उस्फूर्त अशा पारंपरिक, लवचिक आणि प्रभावी बोली भाषेचेच एक रूप असल्याचे डॉ. खांडगे यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नाटयदिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे म्हणाले की,
प्रयोगरुपाने आविष्कृत होणारी भाषा म्हणजे रंगभाषा होय. लोकरंगभूमीवरील भाषेची क्षमता ही नाटक आणि सिनेमापेक्षा वेगळी आहे हेच तिचे मोठे बलस्थान आहे. दृष्य, काव्य, सौंदर्याची अनुभुती देणारी कायमस्वरुपी मनावर कोरली जाते ती सर्वोच्च रंगभाषा ठरते असे सांगून प्रा. केंद्रे यांनी रंगभाषेविषयी सखोल विवेचन याप्रसंगी केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात विश्वास पाटील म्हणाले की, पारंपारिक तमाशात बदल करुन स्थळ,काळाचा स्वर लोककलाकारांनी पकडला पाहिजे. कुठलीही कला ही स्थळ, काळाचा नवा स्वर जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत ती जिवंत राहू शकत नाही अथवा ती लोकांच्या भावनेचा किंवा आशा आकांक्षाचा आवाज होऊ शकत नाही. आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मराठी भाषेवर, मुंबईवर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या बादशहांची नजर पडते आहे. हे बादशहा आमची भाषा, संस्कृती, साहित्य गिळायला निघालेत. या कठीण काळात लेखक, कलावंत, अभ्यासक यांनी काळाची गरज म्हणून आपली मराठी भाषा आणि संस्कृती सांभाळायला हवी असे मत कांदबरीकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
या परिसंवादात उद्घाटन सत्राखेरीज अन्य दोन सत्रे संपन्न झाली. विधीनाट्य आणि भक्तीनाट्याची लोकभाषा आणि अभिजात मराठी या सत्राचे अध्यक्षपद संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी भूषविले. याप्रसंगी ज्येष्ठ लोककला अभ्यासक व पत्रकार मुकुंद कुळे आणि संतोष शेणई यांनी अनुक्रमे विधीनाट्य व भक्तीनाट्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
समारोप सत्रात वगनाट्य लोकनाट्य व तमाशाची रंगभाषा व अभिजात मराठी या विषयावर मान्यवरांनी चर्चा केली. या चर्चासत्राचे अध्यक्षपद डॉ.प्रकाश खांडगे यांनी भूषविले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख व सुप्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून तमाशा आणि अभिजात मराठी या विषयावर मार्गदर्शन केले. लोकनाट्य या विषयावर ज्येष्ठ लोककला अभ्यासक सोपान खुडे यांनी तर लोकनाट्य विषयावर ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा.सत्यजित खांडगे यांनी केले. प्रसंगी साहित्य अकादमी द्वारा प्रकाशित पुस्तकांच्या प्रदर्शनाचा लाभ उपस्थित संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांना घेता आला.