मावळ ऑनलाईन – भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या ‘ साहित्य अकादमी ‘ व तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर (Talegaon Dabhade) संस्थेच्या ‘ इंद्रायणी महाविद्यालय ‘ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकरंगभूमी’ आणि ‘अभिजात मराठी ‘ या विषयावरील एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन इंद्रायणी महाविद्यालयाच्या कांतीलाल शहा सभागृहात शनिवार दि २८ जून २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत हा परिसंवाद होणार आहे.
या परिसंवादाचे उद्घाटन पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अविनाश अवलगावकर यांच्या हस्ते होणार आहे. या परिसंवादाचे बीजभाषक म्हणून ज्येष्ठ लोककला अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे हे संबोधित करणार आहेत. याप्रसंगी ज्येष्ठ नाटककार पद्मश्री वामन केंद्रे तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे हे प्रमुख उपस्थित असणार आहेत. उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य पानिपतकार विश्वास पाटील हे भूषविणार आहेत. उद्घाटन सत्राचे स्वागत साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नायर हे करणार असून प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे करणार आहेत.
Dehuroad : देहूरोडच्या श्री शिवाजी विद्यालयात अमली पदार्थ विरोध दिनानिमित्त जनजागृती
या परिसंवादात दोन सत्रे होणार असून पहिले सत्र विधीनाट्य व भक्तीनाट्याची रंगभाषा आणि अभिजात मराठी असे होणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे भूषविणार आहेत.याप्रसंगी लोकसाहित्याचे अभ्यासक मुकुंद कुळे व संतोष शेणई यांचे निबंध वाचन होणार आहे.
दुसऱ्या सत्रात वगनाट्य, लोकनाट्य व तमाशाची रंगभाषा व अभिजात मराठी या विषयावर मार्गदर्शनपर विवेचन होणार असून डॉ. प्रकाश खांडगे या सत्राचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख व नामवंत लोककलाकार डॉ. गणेश चंदनशिवे, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ व सोपान खुडे यांचे निबंध वाचन होणार आहे.
भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा संबंधी एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचा सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व सर्वच अभ्यासकांनी फायदा घ्यावा असे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉक्टर संभाजी मलघे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.