मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, ही निवडणूक दोन सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार आहे. नगरविकास विभागाने २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. नवीन रचनेनुसार एकूण १४ प्रभाग निश्चित करण्यात आले असून प्रत्येकी दोन नगरसेवक अशा एकूण २८ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.
ओबीसी समाजाला २०२२ पूर्वी लागू असलेले आरक्षणच यावेळी कायम राहणार असून, सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुमारे तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रतिक्षा संपली आहे.
नियोजनानुसार प्रभागरचना ठरवणार
प्रभागांच्या सीमारेषा ठरवताना मुख्य रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, फ्लायओव्हर आणि अन्य नैसर्गिक अडथळे यांचा विचार करण्यात येणार आहे. कोणत्याही इमारती, चाळी किंवा वस्त्यांचे विभाजन टाळले जाणार असून, रस्ते, सिटी सर्व्हे नंबर आदींचा स्पष्ट उल्लेख सीमावर्णनात केला जाणार आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रभागरचनेचा प्रारूप अहवाल तयार करण्यात आला असून तो लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे.
२०११ ची जनगणना आधारभूत
कोरोनानंतर जनगणना न झाल्यामुळे २०११ ची लोकसंख्या (५६,४३५) गृहित धरली जात आहे. त्यामुळे शहरातील लोकसंख्या वाढ असूनही नगरसेवकांच्या संख्यावाढीला आळा बसला आहे. निवडणूक जरी नव्या प्रभागरचनेनुसार होत असली, तरी लोकसंख्या वाढीचा परिपाक यामध्ये दिसून येणार नाही.
Crime News : रस्ता बंद असल्याचे सांगितल्याने एकास मारहाण
Pimpri Chichwad Crime News 13 June 2025 : हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार
राजकीय चित्र बदलतेय!
मागील पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे १४, तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ६, तर जनसेवा विकास समितीचे ६ नगरसेवक निवडून आले होते. तिन्ही गटांत प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक होता. भाजपच्या चित्रा जगनाडे नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आल्या होत्या. नंतरच्या घडामोडींमध्ये भाजपकडे १२, विकास समितीकडे ७ आणि जनसेवा समितीकडे ७ नगरसेवक होते. त्यानंतर नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली.
दरम्यान, मावळ तालुक्यात गेल्या काही वर्षांत विविध पक्षांमध्ये नेत्यांची उलथापालथ झाली असून, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे पारडे जड ठरणार याबाबत उत्सुकता आहे.
निवडणुकीनंतर प्रलंबित कामांना गती मिळण्याची आशा
प्रशासकीय राजवटीच्या काळात अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे नव्या प्रतिनिधींची निवड झाल्यानंतर शहराच्या विविध विकास योजनांना गती मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
“शासनाच्या सूचनांनुसार दोन सदस्यीय प्रभाग रचनेचा अहवाल तयार केला असून तो लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येईल.”
— विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद