Team MyPuneCity – ‘यशोगाथा संघर्षाची’ हे डॉ. टी. टी. पाटील यांचे(Suhas Divase) आत्मकथनपर पुस्तक म्हणजे त्यांच्या आयुष्याची शिदोरी असून सफलतेची यशोगाथा आहे. पुस्तक वाचनातून उर्मी मिळते. ‘माणसात गुंतवणूक करा’, ‘जे कराल त्यावर नितांत प्रेम करा’ आणि ‘तुम्ही स्वत:च एक ब्रँड आहात’ हे त्यांचे विचार आयुष्यातील वाटचालीत प्रत्येकाला उपयोगी ठरणार आहेत, असे प्रतिपादन जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख (नि.) डॉ. सुहास दिवसे यांनी केले.
खान्देश सुपुत्र डॉ. टी. टी. पाटील लिखित ‘यशोगाथा संघर्षाची’ या आत्मकथनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा साफा बँक्वेट हॉल, बालेवाडी हायस्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी डॉ. दिवसे अध्यक्षपदावरून बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, बीव्हीजी उद्योग समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, जे. एल. आर. उद्योग समूहाचे संचालक गोविंद पाटील, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य (नि.) डॉ. सुरेश सावंत, रिचफिल्ड फर्टीलायझर्स प्रा. लि.चे अध्यक्ष व कार्यकारी संचालक डॉ. स्वप्नील बच्छाव, प्रकाशिका सिंधूबाई टी. पाटील, डॉ. पद्मश्री पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
डॉ. दिवसे पुढे म्हणाले, आदिवासी भागातील एक हुशार विद्यार्थी ते यशस्वी व्यावसायिक हा डॉ. टी. टी. पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. ज्या ज्या व्यक्ती हे पुस्तक वाचतील त्यांचे आयुष्य निश्चित बदलेल.
विजय बाविस्कर म्हणाले, माणसे उगीचच मोठी होत नाहीत. प्रत्येकाचे आयुष्य संघर्षमय असते; पण आयुष्य सुंदरही असते हे डॉ. टी. टी. पाटील यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. सिंधूताई पाटील आणि कुटुंबियांनी डॉ. टी. टी. पाटील यांचे स्वप्न पूर्ण केल्याचे आवर्जून नमूद करून बाविस्कर पुढे म्हणाले, ‘यशोगाथा संघर्षाची’ हे पुस्तक वाचून शेकडो उद्योजक तयार झाले तर ती डॉ. पाटील यांना खरी भावांजली असणार आहे.
Chikhali News : चिखलीत लेबर कॅम्पमधील बेकायदा दारू अड्डा उध्वस्त!
Maval News : शिळींब येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा उत्साहात संपन्न
डॉ. टी. टी. पाटील यांच्या पत्नी सिंधूताई पाटील प्रकाशक या नात्याने बोलताना म्हणाल्या डॉ. पाटील यांनी आयुष्यभर कष्ट केले. त्यांच्या हयातीत पुस्तकाचे प्रकाशन करायचे होते, पण तसे काही झाले नाही. त्यांची पुस्तक प्रकाशन करण्याची इच्छा मात्र पूर्ण केली आहे.
हणमंतराव गायकवाड म्हणाले, पुस्तक वाचताना असे वाटते की, पुस्तक आपल्याशी बोलतेच आहे. वेगळ्या वाटेने जाऊन दीपस्तंभासारखी कामे करणाऱ्या काही व्यक्ती असतात. डॉ. पाटील यांची आत्मकथा वाचल्यास दीपस्तंभासारख्या अनेक व्यक्ती निर्माण होतील.
सचिन ईटकर म्हणाले, डॉ. पाटील यांचा संघर्ष प्रेरणादायी असून त्यांनी उद्यमशीलता विकसित केली आहे. ग्रामीण भागात उद्योजकांची संख्या वाढेल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकणार आहे.
ग्रामीण भागातही गुणवत्ता असते हा मुद्दा अधोरेखित करून योगेंद्र नेरकर म्हणाले, डॉ. पाटील यांनी विद्यार्थीदशेपासून लढा दिला असून जिंकलाही आहे. उद्योग क्षेत्रात येऊ पाहण्याऱ्यांसाठी हे पुस्तक गुरुकिल्ली आहे.
सुरेश सावंत म्हणाले, डॉ. टी. टी. पाटील यांची आत्मकथा एकलव्याची आठवण करून देणारी आहे. ही एका व्यक्तीची आत्मकथा नाही तर खान्देशी लोकजीवनाचे दर्शन यातून घडत आहे. त्यांना चाकोरीबद्ध जगणे मान्य नव्हते. त्यांच्या कार्यातून समृद्ध, बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे दर्शन घडते. डॉ. पाटील यांची जीवनगाथा अभ्यासक्रमामध्ये असावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. संदीप बच्छाव यांनी डॉ. टी. टी. पाटील यांचा जीवनप्रवास कथन केला तर डॉ. पद्मश्री पाटील यांनी पुस्तकाचा प्रवास उलगडला.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संदीप बच्छाव, पंकज पाटील, प्रतिभा बच्छाव, संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.