Team MyPuneCity – पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडण्याची चिन्हं दिसत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) लवकरच पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्या या संभाव्य निर्णयामुळे पुण्यातील काँग्रेसची घडी विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संग्राम थोपटे यांनी आज आपल्या प्रमुख समर्थकांची बैठक बोलावली असून, बैठकीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, २२ एप्रिल रोजी त्यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसमधील अस्वस्थता आणखी वाढली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्यासह काँग्रेसचे आणखी काही वरिष्ठ नेतेही भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राज्य काँग्रेसपुढे नेतृत्व टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे.
Express Way Update : सलग सुट्ट्यांचा फटका; पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी
काँग्रेसचा एक बालेकिल्ला ढासळणार?
संग्राम थोपटे हे भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांच्या नावाभोवती या मतदारसंघात मजबूत पाठीराखा आहे. त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे राज्याचे माजी शिक्षणमंत्री असून, त्यांनीही या मतदारसंघातून तब्बल सहा वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे थोपटे घराण्याचा या भागात जबरदस्त प्रभाव आहे. संग्राम थोपटे भाजपमध्ये दाखल झाल्यास, पक्षाला या भागात मोठा राजकीय फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
प्रदीर्घ आणि ठसठशीत राजकीय कारकीर्द
संग्राम थोपटे यांचा (Sangram Thopte) राजकीय प्रवास देखील तितकाच उल्लेखनीय आहे. वडिलांकडून राजकारणाचा वारसा लाभलेल्या थोपटे यांनी २००२-२००३ मध्ये भोर पंचायत समितीचे उपसभापती म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर २००७ ते २०२४ या दीर्घ कालखंडात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच ते राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षही राहिले आहेत.
२००९ साली त्यांनी पहिल्यांदा भोर-राजगड-मुळशी मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मधील निवडणुकांमध्येही त्यांनी सलग विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली.