गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
Team MyPuneCity –भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सुबद्ध संगीत समारोहात विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या रागांचे प्रतिथयश कलाकारांनी सादरीकरण केले. शुद्ध सारंग, झिंझोटी, अल्हैया बिलावल, खमाज, मुलतानी, मारवा, अहिरभैरव, शामकल्याण, रागेश्री, हंसध्वनी, शंकरा, पुरिया धनाश्री, गावती अशा विविध रागांचे सादरीकरण तीन दिवसीय समारोहात झाले.
दि. 1 ते 3 मे या कालावधीत गांधर्व महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात सुबद्ध संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्तसुरांमध्ये रंगलेला समारोह रसिकांसाठी पर्वणी ठरला. समारोहाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राजश्री महाजनी यांनी शुद्ध सारंग रागातील ‘आयी सब मिल देवो मुबारक बतिया’ ही बंदिशीने केली. त्यानंतर झिंझोटी रागातील दोन बंदिशी सादर करून शुद्ध सारंगमधील ‘अब मोरी बात मानले पिहरवा’ या बंदिशीने सांगता केली.

यानंतर स्वानंदी सडोलीकर यांचे सुश्राव्य गायन झाले. त्यांनी अल्हैया बिलावल रागातील ‘माई इक तो कथा’ ही बंदिश सादर करून हिंडोल रागातील ‘पैंजनिया मोरी बाजन लागी’ आणि ‘सजनवा आ मोरे ’ या बंदिशी सादर केल्या. लहान मुलांना शास्त्रीय संगीताची गोडी लागावी या हेतूने कार्यरत असणाऱ्या सडोलीकर यांनी दीपचंदी रागात ‘कितना मजा आता होगा, सायकल जब वो चलाता होगा’ या कवितेचे सादरीकरण करून रसिकांना चकित केले.

पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात सूरमणी धनंजय जोशी यांचे सुरेल गायन झाले. सुरुवातीस त्यांनी रागेश्री रागातील ‘राखो पत मोरी’ ही रचनासादर केली.
समारोहाच्या दुसऱ्या दिवशी हर्षद डोंगरे यांनी राग मुलतानीमधील दोन पारंपरिक रचना सादर केल्या. यासह मारवा रागातील गुणीदास रचित ‘हो गुणियन मिल गावो बजावो’ तसेच जयजयवंती रागातील ‘माने ना मोरा जियरा’ ही स्वरचित बंदिश सादर केली. त्यानंतर सवाई गंधर्व यांच्या पणतसून श्रुती देशपांडे यांचे सुमधूर गायन झाले. त्यांनी अहिरभैरव रागातील ‘ए रसिया म्हारा’ ही रचना सादर करून गुरू पद्माताई देशपांडे यांनी रचलेली श्यामकल्याण रागातील ‘रघुनंदन खेलन मांगे चांद’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. दुसऱ्या दिवसाची सांगता डॉ. रवी फडके यांच्या गायनाने झाली. त्यांनी रागेश्री रागातील छोटे ख्याल आणि राग हंसध्वनी सादर करून आपल्या मैफलीची सांगता मेहंदी हसन यांनी सुप्रसिद्ध केलेल्या ‘तनहा तनहा मत सोचा कर’ या गझल सादरीकरणाने केली.

समारोहाचा सुरेल समारोप शुभदा देशपांडे, शिल्पा आठले, राधिका ताम्हनकर, सावनी गोगटे यांच्या गायनाने झाला. शुभदा देशपांडे यांनी शंकरा रागातील विलंबित ख्यालातील रचनेने सादरीकरणाची सुरुवात केली. मिश्र पिलू रागातील रचना सादर करून होरी ऐकविली. अखेरीस मास्टर दिनानाथ यांचे ‘जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला’ नाट्यगीत सादर केले. त्यानंतर शिल्पा आठले यांनी पूरिया धनाश्री रागातील ‘पायलिया झनकार मोरी’ ही पारंपरिक बंदिश ऐकविली. त्यानंतर कलावती रागातील विलंबित रूपक आणि तराणा सादर केला.
राधिका ताम्हनकर यांनी मैफलीची सुरुवात राग गावतीने केली. त्यानंतर तराणा सादर केला. गुरू पंडित हेमंत पेंडसे यांच्या ‘यदुवर लागत हे मोहे प्यारो’ या उपशास्त्रीय गायकीतील बंदिश सादर करून रसिकांची मने जिंकली.
तीन दिवसीय सांगीतिक समारोहाचा समारोप सावनी गोगटे यांच्या गायनाने झाला. राग हमीरमधील पारंपरिक बंदिश सादर करून ‘पनघट पे जल भरन रे मै कैसे जाऊ’ या राग बहारमधील बंदिशीने त्यांनी कार्यक्रमाची सांगता केली.
कलाकारांना अभिजित बारटक्के, ऋषिकेश जगताप, संजय करंदीकर (तबला), पंडित प्रमोद मराठे, निलय साळवी, अमेय बिचू, अंशुला मोरे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत पंडित प्रमोद मराठे, डॉ. माधुरी डोंगरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, पंडित हेमंत पेंडसे यांनी केले.