मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्यातील देवघर गावातील गट क्रमांक २५० हा (Maval)अवैध बंगल्यांचे आणि गैरप्रकारांचे केंद्र बनल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य माहिती अधिकार महासंघाचे सचिव प्रदीप नाईक यांनी उघड केलेल्या या प्रकरणामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नाईक यांनी केलेल्या तक्रारीत, देवघर येथील गट नं. २५० वर मोठमोठे बंगले उभारून ते भाड्याने दिले जात असल्याचे तसेच त्या ठिकाणी अनेक बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचा ठपका ठेवला आहे. यासंदर्भात त्यांनी मावळ तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी मंडलाधिकारीकडून सविस्तर अहवाल मागवला होता. मात्र, त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसत आहे.
Lonavala:लोणावळा शहर कचरा व्यवस्थापनासाठी बायो-CNG प्रकल्पास हिरवा कंदील
Pune :सहकारनगर पोलीस ठाण्यात जप्त 16 बिनधनी दुचाकी; वाहन मालकांना सात दिवसांत संपर्क साधण्याचे आवाहन


सर्वात गंभीर बाब म्हणजे, पीएमआरडीएकडे साधा परवानगीचा प्रस्तावही आलेला नाही, हे अधिकृत माहिती अधिकाराच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच देवघरमध्ये उभारलेले हे बंगले संपूर्णपणे अनधिकृत आहेत. तरीदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई न करण्यामागे कोणाचा वरदहस्त आहे, हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे.
सचिन सुरेश साळुंखे, वरिष्ठ लिपिक, यांनी दिलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट नमूद आहे की, गट क्रमांक २५० संदर्भात कोणतीही नस्ती पीएमआरडीएकडे उपलब्ध नाही. यामुळे, या जागेवर झालेले बांधकाम थेट कायद्याला हरताळ फासणारे असल्याचे सिद्ध झाले आहे.
प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनाला व माहिती अधिकारातून मिळालेल्या दस्तऐवजांना तीन महिने उलटून गेले तरीही कारवाईचा मागमूस नाही. यामुळे या अनधिकृत बंगल्यांमागे राजकीय दबाव किंवा अधिकाऱ्यांची संगनमत असल्याचा संशय जनतेतून व्यक्त होत आहे.
देवघर परिसरातील गट नं. २५० वर सुरू असलेला हा अनधिकृत बांधकामांचा व अवैध धंद्यांचा उद्योग थांबवण्यासाठी प्रशासन कधी जागे होणार, हा खडा सवाल आता ग्रामस्थ आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.