मावळ ऑनलाईन –टाकवे बुद्रुक येथील उद्योजक दत्तात्रय गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गायकवाड परिवाराच्या वतीने आषाढी पायी वारीला जाणा-या मावळ तालुक्यातील सर्व दिंडी प्रमुखांचा मंगळवारी (दि १७) विशेष सन्मान करण्यात आला. तालुक्यातील प्रत्येक दिंडीच्या एका पंगतीसाठी रोख रक्कम देण्यात आली. मागील चौदा वर्षापासून दत्तात्रय गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
यंदा दिंडी प्रमुखांचा सत्कार करीत एका पंगतीच्या अन्नदानासाठी रोख रक्कम अदा केली.यावेळी ह. भ. प. विश्वनाथ महाराज केंद्रे यांचे प्रवचन झाले. त्यांनी मानवी जीवनातील विविध पैलू विस्ताराने मांडले. संत कृपेने पारमार्थिक सेवा घडते असा विश्वास केंद्रे महाराज यांनी दिला. मावळ तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मावळ तालुका दिंडी समाज, पवन मावळ दिंडी, घोरावडेश्वर दिंडी,महादू काळोखे दिंडी,कोंडेश्वर दिंडी, तळेगाव माळवाडी दिंडी, संत सेना दिंडी, संत नामदेव दिंडी, भामचंद्र डोंगर दिंडी, श्री पोटोबा महाराज दिंडी, संत जगनाडे दिंडी, संत जगनाडे पालखी सोहळा, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी, संत गवरशेठ दिंडी, श्री चक्रेश्वर, संगमेश्वर दिंडी, संत गोरोबा काका दिंडी,भैरवनाथ दिंडी सोहळा, बोधलेबुवा दिंडी, वैकुंठगमन दिंडी, इंचगिरी रसाळ सांप्रदाय दिंडी, संत तुकाराम सामाजिक ट्रस्ट या दिंडी सोहळयांचा सत्कार करण्यात आला.


वै.सखाराम गायकवाड यांचा मावळ तालुका दिंडी समाजाच्या स्थापनेत पुढाकार होता. त्यांचे अनुकरण करीत गायकवाड परिवार वारकरी संप्रदायाचा वसा जपत आहेत. तसेच गायकवाड परिवारातील युवा नेतृत्व व आंदर मावळातील उद्योजक कै. दत्तात्रेय गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चौदा वर्षांपासून पुण्यस्मरण दिन विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो.
यावर्षी मावळातील दिंडी चालकांचा व वारकऱ्यांचा सन्मान करून प्रत्येक दिंडीसाठी पंगतीच्या अन्नदानासाठी रोख रक्कम देण्याचा संकल्प मावळ तालुका दिंडी समाजाचे माजी अध्यक्ष हभप तुकाराम गायकवाड व प्रसिद्ध उद्योजक तसेच माजी सरपंच बाबाजी गायकवाड यांनी केला आहे. तसेच कै. दत्तात्रय गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाराही महिने विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड म्हणाले, आम्हा शेतकरी कुटुंबाला उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर करण्यात माझे बंधू कै. दत्ताशेठ यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या इतिहासाने बंधूप्रेम शिकवले. तेच प्रेम जपण्याचा प्रयत्न करीत आहे. बंधूंच्या अनेक आठवणी चलचित्रपटासारख्या डोळ्यासमोरून तरळून जातात. त्यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी दरवर्षी सामाजिक उपक्रम केले जातात.