मावळ ऑनलाईन – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूगावात दाखल झाले असून, पावसाच्या सरी झेलत त्यांनी भक्तिभावाने श्रींचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. पावसाचा अडथळा येवढाच — पण भक्तीचा ओघ कमी झालेला नव्हता.
पालखी सोहळ्यानिमित्त भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग, नगरपंचायत, पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वयाने काम केले. मंदिर परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी सतत नजर ठेवली. वाहतूक शाखेचे उपायुक्त सतीश कसबे स्वतः पावसात उभे राहून वाहतूक नियंत्रण करत होते.
यंदा मंदिर परिसरात प्रथमच भव्य प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आली होती. पांडुरंग मंदिर, तुकाराम महाराज मंदिर, दीपमाळा, महाद्वार अशा अनेक ठिकाणी सजावट पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर पालखी प्रस्थानावेळी उपस्थित होते. त्यांनीही वारकऱ्यांबरोबर फुगडी खेळून वारीचा आनंद लुटला. यामुळे सुरक्षिततेसाठी पोलिसांनी अत्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

पावसामुळे काही वेळ पालखी मार्गावरील दिंड्यांना थांबावे लागले. इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीकडे पाटबंधारे विभाग व जीवरक्षक बारकाईने लक्ष ठेवून होते.
वारकऱ्यांसाठी गावातील मंगल कार्यालये, शाळा, धर्मशाळा, सोसायट्यांचे ओसरे खुल्या विश्रांतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले. विविध सामाजिक संस्था, मंडळांनी जेवणाची व्यवस्था केली होती. डाळभात, मसालेभात, भाकरी-भाजी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा अन्नप्रसाद भाविकांना मिळाला. पत्रावळ्यांच्या स्वच्छ व्यवस्थापनाची जबाबदारी नगरपंचायतीच्या घंटागाडीने पार पाडली.
Kundmala Bridge Update : कोसळलेल्या साकव पुलावर अडकलेल्या सात दुचाकी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दोरखंडांनी बाहेर काढल्या
आरोग्य विभागाने चार ठिकाणी वैद्यकीय पथके उभारली होती. चार रुग्णवाहिका व अतिरिक्त कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. संपूर्ण शहरात क्लोरीन व टीसीएलमुळे निर्जंतुक पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. महावितरणचे कर्मचारीही मंदिर परिसरात सतत कार्यरत होते.
तथापि, गावाच्या अंतर्भागात सफाईकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग अजूनही तसंच असल्याने दुर्गंधी निर्माण होत आहे. काही कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे सांगितले की, ठेकेदाराने साफसफाई न करताही प्रशासनाला चुकीची माहिती दिली आहे. या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
यात्रेदरम्यान वहातूक पोलिसांवर ताण असतोच. यंदाही त्यांनी देहू-आळंदी मार्गावरील वाहतूक तळवडेमार्गे निगडी-चाकणकडे वळवली. त्यामुळे गावात वाहतूक कोंडी टळली, मात्र पावसामुळे काही वाहनं रस्त्याच्या कडेला उभी राहिल्याने संथ गतीने वाहतूक पुढे सरकत होती.
रात्रीचे वातावरण तर भक्तीमयच! गावात अनेक ठिकाणी वारकरी हरिपाठ व भजनात रमले होते.