ज्येष्ठ संपादक प्रकाशक दिलीप माजगावकर यांची अपेक्षा
ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ विशेषांकाचे प्रकाशन
Team MyPuneCity –’साहित्यकृतीने वाचकांना आनंद द्यावा तसेच साहित्यकृतींच्या समीक्षात्मक मूल्यमापनासाठी वाचकांचीही पूर्वतयारी हवी’, अशी अपेक्षा ज्येष्ठ संपादक, प्रकाशक व राजहंस प्रकाशनाचे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांनी रविवारी येथे व्यक्त केली. ‘सुधीर रसाळ यांचे ललित अंगाने केलेले व्यक्तिचित्रणात्मक (Akshar Vangmay) लेखन उत्तम आहेच, पण त्यांचा मूळ पिंड समीक्षेचाच आहे’, असेही ते म्हणाले.
‘अक्षर वाङ्मय’ या नियतकालिकातर्फे सिद्ध करण्यात आलेल्या सुधीर रसाळ विशेषांक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रसिद्ध कवी, वक्ते इंद्रजीत भालेराव, विशेषांकाचे अतिथी संपादक डॉ. अरुण प्रभुणे, ‘अक्षर वाङ्मय’ चे संपादक डॉ. नानासाहेब सूर्यवंशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
माजगावकर म्हणाले, ‘रसाळ आणि माझा परिचय तुलनेने उशिरा झाला. मात्र, रसाळ सर भाग्यवान आहेत. ललित लेखकाच्या वाट्याला येणारे सर्व सन्मान, पुरस्कार त्यांच्या मागे चालत आले. आज प्रकाशित झालेला विशेषांक हा त्यांना मिळालेला सर्वोच्च सन्मान, पुरस्कार आहे, असे मला वाटते. या विशेषांकाला संदर्भग्रंथाचे मूल्य आहे. रसाळ यांनी ज्या आत्मीयतेने ललित शैलीतील व्यक्तिचित्रणात्मक लेखन केले, तेच रसाळ सर समीक्षात्मक लेखन करताना काहीसे अनवट, बोजड व क्लिष्ट का होतात, असा प्रश्न मला पडतो. मात्र, रसाळ साहित्यकृतींचे मूल्यमापन वेगळेपणाने करतात, मर्मस्थाने नेमकी टिपतात. रसाळ यांची ही वैशिष्ट्ये या विशेषांकात उत्तम पद्धतीने व्यक्त झाली आहेत, त्यामुळे हा विशेषांक प्रकाशित होणे मला महत्त्वाचे व आनंदाचे वाटते’.
प्रसिद्ध कवी आणि रसाळ सरांचे शिष्य इंद्रजीत भालेराव यांनी विशेषांकातील प्रत्येक लेखाचा परामर्ष घेणारे टिपण सादर केले. ‘भाषेची सतत चिंता करणारा, कामाचे पर्वत उभे करणारा, समीक्षेच्या संकल्पना सुस्पष्टपणे मांडणारा, स्वतंत्र दृष्टीने समीक्षा करत समाजदर्शन घडवणारा सद्गुरु आम्हाला रसाळ सरांच्या रूपाने भेटला, हे आमचे भाग्य’, अशी भावना भालेराव यांनी व्यक्त केली.
विशेषांकाचे अतिथी संपादक डॉ. अरुण प्रभुणे यांनी अंकामागील संकल्पना स्पष्ट केली. ‘व्यक्ती आणि वाङ्मयदर्शन, हा मूळ हेतू आहे. रसाळ सरांच्या उपयोजित समीक्षेची समीक्षा पुढे यावी’, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘समीक्षा हा गंभीरपणे करण्याचा ज्ञानव्यवहार आहे. सध्या पुस्तक परिचय लिहिणारे स्वतःला समीक्षक म्हणू लागले आहेत. समग्रता हे मूल्य आहे त्याचा अभाव आजच्या समीक्षेत दिसतो. डॉ रसाळ यांनी हे मूल्य महत्वाचे मानले. डॉ सुधीर रसाळ हे गटातटापासून आणि वाङ्मयीन राजकारणापासून दूर राहून काम करणारे व्रतस्थ, ऋषितुल्य समीक्षक आहेत. उत्तम कलाकृतींचे सर्जन आणि दुय्यम कलाकृतीचे हनन हा समीक्षकांचा धर्म त्यांनी प्राणपणाने जपला आहे. या विशेषांकातून त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचे आणि व्यक्तित्वाचे सुरेख दर्शन घडते. फड गाजविणे, सभा गाजविणे आणि मैफल गाजविणे हे आपण ऐकून आहोत. सध्या पुस्तक गाजविणे या रोगाने साहित्यविश्वाला ग्रासले असून हा वाङ्मयीन व्यभिचार आहे. त्यात काही समीक्षक सहभागी आहेत हे दुर्दैव आहे. समीक्षेचे अध:पतन म्हणजे साहित्य व्यवहाराचे अध:पतन. लेखकाचे प्रतिभा जीवन आणि त्याचे व्यावहारिक जीवन यांची सरमिसळ करुन निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ‘या विशेषांकातून रसाळ सरांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचे दर्शन घडते. आपला समीक्षाधर्म निष्ठेने आचरणाऱ्या सरांची ज्ञानसाधना आजही अविरत सुरू आहे. त्यांनी संस्थात्मक कार्यही केले आणि उत्तम शिष्य घडवले. समीक्षेत सध्या समग्रतेच्या भानाची उणीव जाणवते. रसाळ सर आपली व्यापक व समग्र दृष्टी जपत वाङ्मयीन( Akshar Vangmay ) मूल्ये जपत समीक्षेचे क्षेत्र समृद्ध करत आहेत, त्याचे उत्तम दर्शन या अंकातून घडते’, असेही प्रा. जोशी म्हणाले.
Let’s talk about tribal cinema: ‘आदिवासी सिनेमावर बोलू काही..’ विषयावर मंगळवारी परिसंवादाचे आयोजन
प्रकृती अस्वास्थ्यामुळे रसाळ सर कार्यक्रमात उपस्थित नव्हते; पण दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी सहभाग नोंदवला. विशेषांकासाठी साह्य करणारे सूर्यकांत देशपांडे तसेच लेखकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रा. दीपक चिद्दरवार यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजीराव देशमुख यांनी आभार मानले. अक्षर वाङ्मयचे संपादक नानासाहेब सूर्यवंशी यांनी स्वागतपर प्रास्ताविक ( Akshar Vangmay ) केले.