मावळ ऑनलाईन – किल्ले लोहगडला आता जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे लोहगड (Lohagad)पाहण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी, इतिहास समजून घेण्यासाठी तसेच, पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक वाढत आहेत. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे लोहगडची किर्ती आता जगभरात झाली आहे.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली व मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही पवित्र भूमी आहे. तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी आता समस्त मावळवासियांची आहे. मावळ तालुक्यातील लोहगड व विसापूर हे प्रमुख पर्यटन केंद्र बनले आहे. त्यापैकी लोहगडावर आता बऱ्यापैकी सुधारणा झाल्या आहेत. लोहगड हा आता अतिशय सुंदर किल्ला झाला आहे. गडावरील देखणे बुरुज, तटबंदी, पायऱ्या, गडावरील पाच दरवाजे त्यापैकी, गणेश व हनुमान दरवाजाला पुरातत्व विभागाने नवीन ऐतिहासिक पद्धतीने भव्य असे नवीन दरवाजे बसवले आहेत. गडावरील लक्ष्मी कोठी, विंचू कडा, सोळा कोन तलाव, इत्यादी गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. लोहगडावरून पाहिले तर समोर विसापूर किल्ला, पवना धरणाच्या बाजूला तुंग व तिकोना किल्ला तसेच, आजूबाजूला असलेले जंगल गडाची शोभा वाढवतात.
Vadgaon Maval: श्री संत तुकाराम कारखान्याचा २८ वा बाॅयलर अग्निप्रदीपन सभारंभ सपन्न
Pune: श्रीमती सायली वैद्य आणि सुंदर वेलनेस सेंटर द्वारे आयोजित ‘कन्सिव्ह नॅचरलि कॉन्फरन्स (सीएनसी) आरोग्यदायी पालकत्वासाठी आशेचा किरण ठरली

युनेस्कोचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे लोहगडला प्रचंड पर्यटक वाढत आहे. देश, विदेशातील पर्यटक या ठिकाणी येत आहेत. हॉटेल, लॉजिंग, टुरिझम हे व्यवसाय तेजीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे ही खूप जमेची गोष्ट आहे. परंतु व्यावसायिकाने व्यवसाय करत असताना गड किल्ल्यांचे महत्त्व व त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता या ठिकाणी काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. बेबंध पर्यटकांच्या आहारी न जाता नीतिमत्ता टिकवली पाहिजे. या परिसरात पूर्णपणे दारूबंदी झाली पाहिजे व अमली पदार्थांचा या ठिकाणी अजिबात वापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. फार्म हाऊसच्या नावाखाली चाललेली वृक्षतोड देखील थांबली पाहिजे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व करवंदाच्या जाळ्या नष्ट होत आहेत. याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. या ठिकाणी पायाभूत सुविधा जसे, गडावर पिण्याच्या पाण्याची व संडास बाथरूमची व्यवस्था केली पाहिजे. या दोन्ही मूलभूत सुविधा पुरातत्त्व विभागाने ताबडतोब कराव्यात अशी मागणी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, मार्गदर्शक संदीप गाडे, बसप्पा भंडारी, सचिन निंबाळकर, गणेश उंडे, अमोल गोरे,अनिकेत आंबेकर, अजय मयेकर, चेतन जोशी, ओमकार मेढी, सिद्धेश जाधव आदी कार्यकर्त्यांनी केली.
त्याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोहगड पायथ्याला लवकरात लवकर शिवसृष्टी उभी राहिली पाहिजे. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम त्यांची नीतिमत्ता, त्यांचे चारित्र्य याचे समग्र दर्शन घडेल. याद्वारे गड किल्ले म्हणजे फक्त मौज-मजेचे ठिकाण नसून आजही येथे शिवरायांचे अस्तित्व असल्याची त्यांना जाणीव होईल. म्हणून किल्ले लोहगड हे शिवतीर्थ व्हावे असे आवाहन मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी केले.