मावळ ऑनलाईन –तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील नवलाखउंब्रे ते बधलवाडी (Talegaon Dabhade)दरम्यानच्या MIDC फेज १ ते फेज २ जोडरस्त्याच्या अभावामुळे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या मार्गाच्या कामासंदर्भात प्रशासन व संबंधित यंत्रणांकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता नवलाख उंब्रे येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरात महत्त्वपूर्ण सभा आयोजित केली आहे.
या बैठकीत MIDC बंद, उपोषण, रास्ता रोको यांसारख्या तीव्र आंदोलनांचा निर्णय घेण्यात येणार असून यापुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे.
PCMC: पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवारा केंद्र निराधारांसाठी ठरतंय आधार
Bhaje Leni: भाजे लेणीजवळ दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू


रस्त्याच्या अभावामुळे गंभीर परिणाम
९०० मीटरचा हा रस्ता नसल्याने नवलाख उंब्रे, बधलवाडी, आंबी, मंगरूळ, जाधववाडी, मिंडेवाडी आणि कदमवाडी येथील नागरिक, तसेच MIDCतील कामगार आणि वाहनचालक यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. सकाळी व सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होत असून अनेक वेळा दोन-दोन तास वाहतूक ठप्प होते. गेल्या काही वर्षांत या मार्गावर अपघातात १५ जणांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न
ह्युंदाई, एल अँड टी, इमरसन आदी मोठ्या कंपन्यांसह या परिसरात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू आहेत. मात्र, फेज १ ते फेज २ जोडणारा रस्ता गेल्या ८ वर्षांपासून केवळ कागदावरच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MIDC प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली गेली, परंतु याकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नाही.
११ ऑगस्टपासून तळेगाव MIDC बंद आणि बेमुदत उपोषण
या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ११ ऑगस्टपासून तळेगाव दाभाडे MIDC बंद करण्याचा व MIDC पोलीस ठाण्याजवळ बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा या बैठकीत दिला जाणार आहे. जोपर्यंत या रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
ग्रामस्थांचा निर्धार
हा रस्ता झालाच पाहिजे, आता गप्प बसणार नाही, असा निर्धार या भागातील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यामध्ये नवलाखउंब्रे, बधलवाडी, आंबी, मंगरूळ, जाधववाडी, मिंडेवाडी व कदमवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
उपस्थित राहण्याचे आवाहन
या बैठकीसाठी माजी सभापती निवृत्ती शेटे, उद्योजक रामदास काकडे, माजी उपसभापती शांताराम कदम, दत्तात्रय पडवळ, नवनाथ पडवळ, पांडुरंग कोयते, संतोष नरवडे, देविदास पडवळ, रवींद्र कडलक, संतोष उडाफे, रामदास लालगुडे, पंडित दहातोंडे, संदीप शेटे, रवी बधाले, दत्तात्रय कदम, जालिंदर शेटे, सरपंच अलका बधाले आदींनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सभा स्थळ : श्री भैरवनाथ मंदिर परिसर, नवलाख उंब्रे
वेळ : सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता
संपर्क : श्री शांताराम कदम (मा. उपसभापती) – ९८२२५०८५३६
आंदोलनाची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली
यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयासही निवेदन पाठवून ११ ऑगस्टपासूनचे MIDC बंद आंदोलन आणि उपोषण याची जबाबदारी शासनावरच राहील, असे नमूद करण्यात आले आहे.