मावळ ऑनलाईन –मावळ तालुक्याच्या विविध गावांमध्ये वटपौर्णिमा अतिशय उत्साहाने आणि आनंदाने पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी महिलांनी वटवृक्षाची पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळू दे! अशी मनोकामना व्यक्त केली.
मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात तसेच शहरी भागातही वटपौर्णिमा उत्सव महिला वर्गांकडून साजरा करण्यात आला. सकाळपासूनच महिलांनी पूजेचे ताट आणि अतिशय उत्साहाने सौभाग्य अलंकार धारण करून गाव पातळीवरील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षाची पूजा केली. यावेळी महिला आपापल्या आळीतील, गल्लीतील महिलांसोबत गटागटांनी आल्या होत्या.वडाला दो-याने फे-याने सुतविले.गहू,आंबा, खण वाहून ओटी भरली, विडाही देऊन पूजा केली.
Maval Crime News : गांजा विक्री प्रकरणी तरुणास अटक
पूजा झाल्यावर त्यांनी त्याच ठिकाणी त्या वटवृक्षाला मनोमन प्रार्थना करून सात फेऱ्या मारल्या.सात जन्मी हाच पती आपल्याला मिळू दे! अशी प्रार्थना ही केली.तसेच पूजेसाठी आलेल्या महिलांनी एकमेकींना हळदी कुंकूवाचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. घरी आल्यावर संपूर्ण कुटुंबासह गोडधोड जेवणाचा आस्वाद घेतला.

वटपौर्णिमेच्या या पूजा समारंभात नववधू अतिशय आनंदित, खुशीत दिसत होत्या. सर्वजणी नुकत्याच झालेल्या लग्नात आई-वडीलांनी व सासू-सासर्यांनी घेतलेले सुवर्ण अलंकार परिधान करून पूजेसाठी आल्या होत्या.
माहेरी आपल्या आईबरोबर तर सासरी आपल्या सासू व परिवारातील सदस्यांबरोबर अतिशय अभिमानाने या नववधू आल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद अतिशय ओसंडून वाहत होता तर वटपूजा केल्यानंतर त्यांनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी मनोकामना ही या ठिकाणी व्यक्त केली.
वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वट- वृक्षाची श्रद्धेने पूजा करतात. विशेषतः या पूजेला आंब्याचे विशेष महत्त्व आहे.याठिकाणी आंबा हे फळ वाहिले जाते. त्यामुळेच आंब्याचे भाव आज वाढलेले आहेत. आंबा खूपच भाव खाऊन गेला.