आंदोलनाकडे राजकीय मान्यवरांची पाठ
Team MyPuneCity – नदी सुधार योजनेच्या(Save River) विरोधात पर्यावरणप्रेमी संस्थांनी गुरुवारी (२४ एप्रिल) एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. मागील दोन महिन्यांपासून विविध संस्थांकडून आंदोलन केले जात आहे. नदी सुधार प्रकल्प थांबवून नद्यांमधील पाणी अगोदर स्वच्छ करा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनाकडे मात्र राजकीय मान्यवरांनी पाठ फिरवल्याचे दिसले. दरम्यान, दिवसभर या आंदोलनाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.


नद्यांच्या काठावर जॉगिंग ट्रक नको, नद्या पर्यावरणासाठी (Save River) आहेत कन्स्ट्रक्शनसाठी नाहीत, नदी प्रदूषण रोखा, सांडपाणी प्रक्रिया करा, नागरिकांना कॅन्सरसारख्या आजारातून वाचवा, नदी सुधारच्या नावाखाली सुरु असलेली वृक्षतोड थांबवा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पिंपरी-चिंचवड मनपाच्या गेटवर हे आंदोलन करण्यात आले.

मागील काही दिवसांपूर्वी शहरातील पर्यावरण प्रेमींनी (Save River)मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना नदी सुधार प्रकल्प थांबवून नद्यांची स्वच्छता प्राधान्याने करा, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले. आदेशानुसार मनपा आयुक्तांनी शहरातील पर्यावरण प्रेमी संस्था, सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मात्र या बैठकीत पर्यावरणप्रेमींचे समाधान झाले नाही. हा प्रकल्प पुढे रेटून नेण्याचा प्रशासनाचा डाव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
राजकीय मान्यवरांची पाठ
आंदोलन स्थळी गुरुवारी दिवसभर विविध क्षेत्रातील नागरिकांनी भेट देत (Save River) आंदोलनात सहभाग घेतला. शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे या आंदोलन स्थळी येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र आंदोलन पूर्ण झाले तरी त्यांनी हजेरी लावली नाही. तसेच शहरातील एकाही राजकीय व्यक्तीने या आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी पाहायला मिळाली.